‘भाजपचा स्थापना दिवस…झुंबड वाढली पण् मुख्यमंत्र्यांच्या काकू संतापल्या’, नेमकं काय घडलं?

Shobhatai Fadanvis Statement On Sudhir Mungantiwar : राज्यभरात काल भारतीय जनता पक्षाचा (BJP) स्थापना दिवस उत्साहात साजरा झालाय. भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. परंतु भाजपच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने पक्षातील अंतर्गत गटबाजी देखील खुलेपणाने समोर आलीय. भाजपची शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळख आहे. परंतु होणारी गटबाजी बघून मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांच्या काकू संतापल्या. भाजपचा कॉंग्रेस होऊ देऊ नका, अशा कानपिचक्या जेष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस (Shobhatai Fadanvis) यांनी दिल्या आहेत.
चंद्रपुरमध्ये (Chandrapur) भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि आमदार किशोर जोरगेवार यांनी दोन स्वतंत्र कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. यावरूनच शोभाताई फडणवीस संतापल्या. त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांचं नाव न घेता टीका केली आहे.
रोहित पवारांना शिंदेंचा दे धक्का! राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची शिंदेंसोबत गुप्त बैठक
मंत्रिपद मिळू नये म्हणून विरोध केल्याने सुधीर मुनगंटीवार जोरगेवार, अहिर आणि शोभाताई यांच्यावर संतापलेले आहेत. त्यामुळे त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये मुनगंटीवार यांनी हजेरी लावणं अशक्यच होतं. तर दुसरीकडे शोभाताईंनी नाव टाळत त्यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी या कार्यक्रमाला यायला पाहिजे होतं. आपल्या पक्षाला कॉंग्रेस करू नका, असं म्हणत शोभाताईंनी टोला लगावला. यामुळे भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर येताना दिसत आहे.
यावेळी बोलताना शोभाताई म्हणाल्या की, आपल्या पक्षाचं सरकार राज्यात अन् केंद्रात आहे. तेव्हा या जिल्ह्यातील पक्षात का भांडणे व्हावीत? याठिकाणी आज एवढा मोठा मेळावा आहे, त्यामुळे ते मोठ्या मनाने समोर का येत नाही. कशासाठी दुसरा मेळावा घेता? लोकांच्या मनामध्ये यामुळे काय निर्माण होतं? आमदार जोरगेवार यांचा हा जिल्हा आहे. त्यांचं कार्यक्रम घेणं काम आहे. त्यामुळे ओपनली सांगते, की सगळ्यांनी मोठेपणाने कार्यक्रमाला हजर राहणं गरजेचं होतं. आपल्या पक्षात यायला लोकं तयार आहेत. त्यांची झुंबड वाढली आहे. जर आपली इथे भांडणं झाली, तर कॉंग्रेस झाली असं म्हणणार नाही? असा सवाल देखील यावेळी शोभाताईंनी केला.
आपल्याला आपल्या पक्षाची कॉंग्रेस होऊ द्यायची नाही. तर आपल्याला आपला भाजप पक्ष टिकवायचा आहे, असं शोभाताई फडणवीस म्हणाल्या आहेत.